स्वरधुंद रागिणी ही झाली अता विराणी
आई, तुझ्या स्मृतीने डोळ्यात आज पाणी
तू लावलीस ज्योत हृदयात भावनांची
तू लावलीस गोडी मज काव्य-संगीताची
अश्रू व वेदनांची उरली जुनी निशाणी
होतीस तू घरात, माया मिळे पिलांना
नव्हती भिती कशाची त्या सान पाखरांना
कंपीत भावनांची ही आज शोकवाणी
मृत्यूसवे निघून गेलीस दूर दूर
परि आर्त ऐकु येई आई तुझाच सूर
भारावल्या मनाने गाते तुझीच गाणी
आता कुणी न येथे, झाली उजाड दुनिया
आई निघून जाता गेली निघून माया
शोधू कुठे, तुला मी कंपीत होइ वाणी
भिजली स्वरात माझ्या आई तुझीच गाथा
चरणी तुझ्याशिवाय ठेवू कुठे मी माथा?
मज ने तुझ्याचपाशी, उरले न आज कोणी
- शैला शहा, पुणे
No comments:
Post a Comment