या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

46) शाळा

माझा एक अनुभव शेयर करतोय. जे काही मी पहिले ते भुत होते की दुसरे काही हे मला माहीत नाही पण अनुभव नक्कीच अंगावर काटा आणणारा होता.
मी मुळचा रत्नागिरीचा पण नोकरी निमित्त गेली १२ वर्षे पुण्यात राहतो. २००० साली मी गोगटे-जोगळेकर कॉलेजला सायन्सच्या शेवटच्या वर्षाला होतो. तेव्हाचा हा एक अनुभव.
मी मुळचा रत्नागिरीचा पण नोकरी निमित्त गेली १२ वर्षे पुण्यात राहतो. २००० साली मी गोगटे-जोगळेकर कॉलेजला सायन्सच्या शेवटच्या वर्षाला होतो. तेव्हाचा हा एक अनुभव.
रात्री जेवण झाले कि आम्ही काही मित्र आमच्या शैलू नावाच्या एका मित्राच्या STD बूथ वर गप्पा मारायला जमायचो. गप्पात इतर तरुण मुलांच्या विषयासारखे मारामार्‍या, मुली, सिनेमे, कॉलेज मधील प्रोफेसर व त्यांची लफडी इत्यादी विषय असायचे पण हळूहळू विषय भुताटकी या विषयावर जायला लागला, ज्याला जो काही अनुभव असे किंवा काही माहीत असे त्याप्रमाणे तो शेयर करायचा. ऐकताना खुप थ्रिल वाटायचे.
त्या STD बूथ पासून माझ्या घरी जाण्याच्या रस्त्याला लागुनच एक पहिली ते चौथी साठी पूर्व प्राथमिक कौलारू शाळा होती. तिला दगडी चिरा वापरून बांधलेला गडगा (कंपाउंड) होता आणि रस्त्याच्या बाजुचा तो गडगा तोडुन शाळेत जायची वाट केली होती, गेट चा पत्ताच नव्हता. दिवसा काही वाटायचे नाही पण रात्री त्या शाळेच्या बाजुने जाताना ती खुप भयाण वाटायची, रस्त्यावरील पोलवरच्या दिव्याच्या प्रकाशात शाळेच्या दारांना लावलेली कुलपे आणि चंदेरी रंगाचा ध्वजस्तंभ चमकायचा, वार्‍यामुळे जीर्ण झालेले झोपाळे आणि घसरगुंड्या करकरायच्या. शांत वातावरणात ते आवाज खुप भीतीदायक वाटायचे. पण कधी काही दिसले नाही.
असेच एका रात्री जेवल्यावर मी STD बूथ वर गेलो होतो, अजुन आमची गॅंग जमा झाली नव्हती. हळूहळू एक-एक तारा उगवायला लागला. चार पाच जण जमल्यावर भुताचा विषय निघाला. प्रताप म्हणाला की त्या शाळेत भुत आहे. साहजिकच मी त्याचे म्हणणे उडवून लावले तेव्हा तो म्हणाला की, अरे त्या शाळेच्या आवारात गेले की पैंजणाचे आणि नाणे जमिनीवर घरंगळत गेल्यासारखे आवाज येतात आणि दारे आपोआप हलतात. मी काही मानायला तयार नव्हतो कारण माझा रोजचा रस्ता असल्यामुळे त्या शाळेजवळूनच मी नेहमी यायचो आणि जायचो अर्थात बाईक वरून पण कधीच काही दिसले नव्हते. झाले, भुताचा छडा लावायचे ठरले आणि आम्ही चौघे शाळेच्या दिशेने निघालो.
चालताना माझा पाय अमितला लागल्यामुळे मी त्याला हात लावून नमस्कार केला त्याचा स्पर्श मला एकदम थंडगार वाटला, वास्तविक रत्नागिरी समुद्र किनार्‍याजवळ वसल्यामुळे मुंबई सारखाच येथेही प्रचंड उकाडा असतो, थंडीचा तर काही संबंधच नाही त्यामुळे मला थोडे नवल वाटले पण मी त्याकडे दुर्लक्ष केले. थोड्याच वेळात आम्ही शाळेजवळ पोहोचलो. शाळेच्या आवारात प्रवेश करताच एक थंड हवेच्या झोताने आमचे स्वागत केले, सर्व अंग मस्त शहारले. लगेच मला अमितचा थंडगार स्पर्श आठवला, आता त्यात हा थंडगार हवेचा स्पर्श मती गुंगावून गेला कारण तो वारा नैसर्गिक नाही वाटला, मन आत जायला विरोध करत होते पण मी तिकडे दुर्लक्ष केले कारण मित्रांच्यात मला माझे हसे करून घ्यायचे नव्हते. आम्ही ध्वजस्तंभाजवळ जाऊन उभे राहिलो आणि शाळेचे अवलोकन करत होतो. इतक्यात आमचा एक मित्र वैभव, STD च्या दिशेने येण्याऐवजी माझ्या घराच्या दिशेने येताना दिसला, त्याला विचारले की इकडून कुठून येत आहेस तर तो म्हणाला की कोणा मित्राकडे गेला होता, आम्हाला थोडे विचित्र वाटले कारण त्याने अंगात एक टी शर्ट आणि कापलेली जीन्सची हाफ पॅंट घातली होती आणि नेहमी बाईकने फिरणारा वैभव काळोखातून चालत येत होता. त्याला फार प्रश्न न विचारता आता शाळेला एक पूर्ण वळसा घालून काही दिसते का ते बघायचे ठरले.
आम्हा पाच जणांपैकी अमित आणि वैभव तिथेच थांबतो म्हणाले आम्हाला आश्चर्य वाटले कारण ते दोघेही खुप भित्रे होते. दोन-तीन वेळा सांगुनही ते तिथेच थांबले म्हणुन त्यांना तिथेच सोडून सचिन, प्रताप आणि मी असे तिघे शाळेच्या गडग्याच्या बाहेरून शाळेला एक चक्कर मारून परत आलो. आम्हाला काहीच वावगे दिसले नाही पण येताना सचिन म्हणाला की आपण त्यांना तिथे एकटे सोडून यायला नको होते आता जर का ते तिथे दिसले नाहीत तर मग आपले काही खरे नाही आणि आम्ही ध्वजस्तंभाजवळ येऊन बघतो तर नेमकी त्याची भीती खरी ठरली; खरेच तिथे कोणीही नव्हते. आता मात्र आम्ही तिघेही घाबरलो की त्यांना काही झाले तर नसेल. आम्ही धावत शाळेच्या आवराबाहेर गेलो आणि ते दोघे STD बूथ वर गेले असावेत असा विचार करून STD च्या दिशेने चालू लागलो तर वैभव आम्हाला STD कडुन आमच्या दिशेने बाईक वर येताना दिसला. तो आम्हाला शिव्या घालु लागला की आम्ही त्याला सोडून भुत बघायला का गेलो? आम्ही म्हटले की तु तर आमच्या बरोबर होतास ना! घाबरलास म्हणुन पळुन गेलास अमित बरोबर! तसा तो म्हणाला अरे मी आत्ता जेवुन STD मध्ये आलोय एवढाच आणि अमित तर मुंबईला गेलाय तो कुठून येईल. आम्हाला वाटले की तो थापा मारतोय म्हणुन आम्ही STD मध्ये आलो आणि शैलुच्या आईला विचारले की हा कधी आला STD मध्ये तर काकी म्हणाल्या, आताच आला. आम्ही चक्रावलो की हा आमच्या बरोबर नव्हता, अमित मुंबईला गेलाय मग मगाशी आमच्या बरोबर जे दोघे होते ते कोण?
परत सगळ्यांनी धीर एकवटला आणि या प्रकरणाचा छडा लावायचाच असा विचा करून वैभव, सचिन, प्रताप, शैलू आणि मी असे सगळे त्या शाळेकडे निघालो. शाळेच्या आवारात पाऊल टाकताच आम्हाला मगाशी जाणवलेला थंडगार वारा पुन्हा एकदा जाणवला. पुन्हा मन आक्रंदु लागले की उगाच विषाची परीक्षा नको पण सगळे बरोबर असल्यावर एक बळ आले होते. आम्ही शाळेच्या उघड्या खिडकीतून आत वाकून बघितले आत भयाण शांतता होती. रस्त्यावरील दिव्याचा प्रकाश उघड्या खिडकीतून आत जात होता त्यात आम्हाला आतील दृश्य अंधुक अंधुक दिसत होते. इतक्यात लोखंडी ट्रंक सरकावल्याचा आवाज माझ्या कानांनी स्पष्टपणे टिपला आणि अंगावर सरकन काटा आला. तो आवाज इतरांनी पण ऐकला होता पण कोणीही पळाले नाही. बघुया काय होते ते असा विचार करून आम्ही अजुन लक्षपूर्वक आत पाहू लागलो आणि अचानक शाळेच्या व्हरांड्या मधुन कोणी तरी धावत गेल्यासारखा आवाज आला म्हणुन खिडकी सोडून आम्ही धावत व्हरांड्याला लागुन असलेल्या मोठ्या जाळीदार खिडकी कडे गेलो आणि आत पाहु लागलो आणि कुठूनशी प्रचंड दुर्गंधी आली जिने नाकाला झिणझिण्या आल्या आणि व्हरांड्याच्या टोकाला एक मानवी आकृती दिसली साधारण ५ एक फुट उंच असेल, अंगात फुल हाताची बनियन, कमरेला टॉवेल किंवा एखादा कपडा गुंडाळलेला आणि डोक्याला फडके गुंडाळलेला असा एक पुरुष दिसला. दरवाज्यांना कुलुपे असताना हा आत कसा काय गेला असेल असा विचार मनात येतो न येतो तोच एक कर्कश किंकाळी फोडून तो माणुस गायब झाला जणु काही हवेतच विरून गेला. ते सगळे पाहून दरदरून घाम फुटला, वळून पाहतो तर वैभव आणि प्रताप केव्हाच शाळेच्या आवारा बाहेर गेले होते. शैलू, सचिन आणि मीच उरलो होतो. आम्ही जीव मुठीत घेऊन धावत रस्त्याच्या दिशेने धावु लागलो तर डोक्यावरून केसाला घासत सरसरत काही तरी गेलेले जाणवले. बघतो तर लहान मुलांची स्लीपर होती ती तशीच परत शाळेवर भिरकावली आणि रस्ता पार करून पलीकडे असलेल्या नवलाई देवीच्या देवळाच्या आवारात गेलो.
सगळे घामाने चिंब भिजले होते आणि सगळ्यांचेच उर धपापत होते, कोणीही एक अवाक्षर देखील काढले नाही. ‘सगळे सुटलो बाबा एकदाचे’ असा विचार करत असतानाच आमचे लक्ष्य शाळेकडे गेले. दोन दरवाज्यांमध्ये अर्धी भिंत आणि भिंतीवर दोन मोठ्या जाळीच्या खिडक्या होत्या आणि त्याच्या मागे व्हरांडा होता आणि अचानक खिडकीच्या आत उजव्या बाजूला एक ज्योत पेटली. मेणबत्ती किंवा समईची ज्योत जशी दिसते अगदी तशीच ती ज्योत होती फक्त अधांतरी होती आणि आता हळू-हळू ती खिडकीच्या उजव्या टोकापासून डाव्या टोकाकडे सरकु लागली. दरवाज्यांना कुलूप लावलेले असताना तो माणुस आता कसा गेला आणि ती ज्योत आत कोणी पेटवली असा विचार मनात येतो न येतो तोच मला एक अनामिक ओढ वाटू लागली आणि नकळत मी शाळेच्या दिशेने ओढला जाऊ लागलो. शैलुच्या हे लक्षात येताच त्याने मला घट्ट पकडून ठेवले आणि वैभवला पटकन जाऊन देवीचा अंगारा घेऊन यायला सांगितले. इकडे एकट्या शैलूला मी आवरत नाही हे पाहून प्रताप आणि सचिनने पण मला पकडून ठेवले. इतक्यात वैभवने देवीचा अंगारा माझ्या कपाळावर लावला आणि मी शरीरातील सगळी ताकद गेल्यासारखा सैल पडलो. माझा विरोध मावळून गेला. थोड्या वेळाने मी भानावर आलो तेव्हा झाला प्रकार सगळ्यांनी मला सांगितला. आपण उगाच या भानगडीत पडलो असे वाटुन सर्वानुमते असे ठरले की आपण शाळेच्या बाहेर उभे राहून माफी मागुया की आम्ही परत तुझ्या वाटेला जाणार नाही. आम्हाला माफ कर. नंतर आम्ही सर्वांनी देवीचा अंगारा कपाळावर लावला व त्या अज्ञात शक्तीची माफी मागितली आणि आपापल्या घरी गेलो. सुदैवाने कोणी आजारी पडले नाही की कोणाला काही त्रास नाही झाला.
पुढे चौकशी केल्यावर असे कळले की पूर्वी एका तरुण वडाराचा खून करून त्या शाळेमागच्या संडासात त्याचा मृतदेह टाकला होता. वडार लोक म्हणजे रस्त्याच्या बाजुला चर खणणारे त्यांचा पेहराव तसाच असतो फुल बाहीची बनियन, कमरेला टॉवेल आणि डोक्याला फडके. आम्हाला शाळेच्या व्हरांड्यात दिसलेली आकृती हुबेहूब त्या वडाराशी जुळणारी होती. आजही मी जेव्हा रत्नागिरीला घरी जाताना त्या शाळेवरून जातो तेव्हा शाळेकडे नजर जाते, तो प्रसंग आठवल्यावर अजुनही अंगावर सरकन काटा येतो. पण परत असा काही अनुभव आला नाही.

मागील लेख वाचा

No comments:

Post a Comment